कोल्हापूर : मोरेवाडी (ता. करवीर) कंजारभाट वसाहतीमधील गावठी हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी छापा टाकला. यामध्ये दारू निर्मिती करणाऱ्या सात सराईतांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम १२३ सह दारुबंदी कायदा ६५ नुसार अजामीनपात्र गुन्हे दाखल केले. यामध्ये दहा वर्षेच्या शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
प्रकाश जॅक्सन बागडे (वय ५६), शक्ती क्रांती माटुंगे (४५), चरण वीरसिंग बागडे (३४), विजय जाकसिंग बागडे (५०), मनोज मोहन मिनेकर (४५), प्रमोद सुनील बागडे (३२), रोहित प्रकाश माटुंगे (३५, सर्व रा. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रकाशवर २२, शक्तीवर १०, चरणवर १४, रोहित, विजय, मनोज यांच्यावर ५ तर प्रमोदवर ४ गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी सकाळी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीमध्ये छापेमारी केली. पोलिसांनी सर्वात आधी दारू तयार करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यानंतर तेथील हातभट्टीचे अड्डे जमीनदोस्त केले. यामुळे संशयितांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये दीड लाखाचे कच्चे रसायन, दारू बनविण्याचे साहित्य व शंभर लिटर गावठी दारू नष्ट केली.
शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपेश इंगळे, अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, गजानन हराळे, सचिन पाटील, अमोल पाटील, सूरज भोपळे यांनी ही कारवाई केली.
कारवाईने पायबंद बसेल
पोलिस, राज्य उत्पादन शुल्क या परिसरातील हात भट्ट्यांवर वारंवार कारवाई केली जात होती. मात्र, या कारवाईची भीती या सराईतांना नव्हती. ते मुद्देमाल सोडून पळून जात होते. मात्र, आता टोळीच्याच मुसक्या आवळल्याने दारू निर्मितीस पायबंद बसेल.
१० वर्षे शिक्षेची तरतूद
पुणे येथे हातभट्टीची विषारी दारू प्राशन केल्याने १० नागरिकांना आपले जीव गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांनी केलेली कारवाई महत्त्वाची आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ नुसार गुन्हा दाखल झाला.