इचलकरंजी : शहरात सुरू होणार्या ई-बस सेवेच्या उद्घाटनासाठी छापण्यात आलेल्या पहिल्या निमंत्रण पत्रिकेत माजी आ. प्रकाश आवाडे आणि माजी आ. सुरेश हाळवणकर यांची नावे वगळल्याचा प्रकार उघडकीस आला. पत्रिका वाटपानंतर काही नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आज नव्याने निमंत्रण पत्रिका काढून त्या वितरित करण्यात आल्या. त्यामुळे ई-बस उद्घाटनाला वादाची किनार लाभल्याची चर्चा शहरात होती.
पीएम ई-बस योजनेंतर्गत इचलकरंजी शहरात उद्यापासून ई-बस सुरू होणार आहे. यासाठी २५ बस दाखल झाल्या आहेत. ई-बस योजनेच्या उद्घाटनाची पत्रिका काढून त्याचे नगरसेवकांना वाटप करण्यात आले. मात्र, या पत्रिकेमध्ये आवाडे आणि हाळवणकर यांचे नाव नसल्याचे निदर्शनास आले. यावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला. काही नगरसेवकांनी प्रशासनाकडून कार्यक्रमाचा प्रोटोकॉल लक्षात घेऊन पत्रिका तयार केल्याचे सांगत सारवासारव केली. मात्र, राजकीय वादाला कारणीभूत ठरू नये यासाठी परिवहन समिती सभापतींना नव्याने निमंत्रण पत्रिका काढून त्या वितरित करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पहिली पत्रिका अंतिम करण्यापूर्वी नेमके कुणाच्या सूचनेवरून झाली यासह महापालिका प्रशासन सत्ताधारी पदाधिकारी आणि विविध राजकीय गटांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे यावरून पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे ई-बस उद्घाटनाच्या आधीच कार्यक्रमाला वादाची किनार लाभली आहे.
डिजिटल फलकावरून खा. माने यांचा फोटो गायब
उद्घाटनाच्या अनुषंगाने लावलेल्या डिजिटल बोर्डवर खा. धैर्यशील माने यांचा फोटो गायब होता. त्यांचा फोटो नसल्याने कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत होता. यावर सोशल मीडियावरही चर्चा रंगली होती. त्यातच उद्घाटनाच्या पहिल्या पत्रिकेत शिवसेना गटनेते रवींद्र माने आणि शिवसेना (उबाठा) गटनेते शिवाजी पाटील यांच्या नावाचा उल्लेख नगरसेवक म्हणून पत्रिकेच्या दुसर्या पानावर करण्यात आला होता. यावरूनही संताप व्यक्त होऊ लागल्याने सभापतींनी नव्याने काढलेल्या पत्रिकेत त्यांचा गटनेते म्हणून उल्लेख करण्यात आला. त्यामुळे ई-बसवरून श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.