कोल्हापूर ः कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरात ब्ल्यू लाईनमध्ये उचगाव ग््राामपंचायतीने बांधकाम परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दस्तुरखुद्द पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या बैठकीतच उपस्थित केला. तसेच बेकायदेशीर बांधकामाबाबत अहवाल झाला असून त्यासंदर्भात माहिती देऊ, असे स्पष्ट केले. पालकमंत्री आबिटकर यांनी महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश असतानाही बांधकामे होणे हे चुकीचे आहे, असे सांगितले. नगरसेवक अश्किन आजरेकर यांनी न्यायालयाच्या स्थगितीनंतरही बांधकामे झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. आदिल फरास यांनी तावडे हॉटेल परिसरातील ब्ल्यू लाईनमधील बांधकामांना जो निर्णय लागू होईल तोच शहरातील बांधकामांनाही लागू करा, असे सांगितले.
सत्यजित कदम यांनी तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्यावा. ब्ल्यू लाईनमध्ये बांधकाम केलेल्यांबाबत काही करू शकत नाही. उचगाव ग््राामपंचायत आणि महापालिकेचा हा वाद आहे. स्थानिक नागरिकांशी वाद नाही. लोकांत भीतीचे वातावरण असून, कुणावरही अन्याय होऊ नये असे सांगितले. दरम्यान, महापालिकेने अद्याप हेरिटेज कमिटी आणि वृक्ष प्राधिकरण स्थापन केली नसल्याने या समित्या तत्काळ नियुक्त करण्याचे आदेश बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
रात्र थोडी... सोंगे फार...
महापालिकेत काम जास्त आणि मनुष्यबळ कमी आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागते. रखडलेल्या प्रश्नांसाठी शनिवार, रविवारीही रात्री 9 वाजेपर्यंत बसतो. तरीही काम संपत नाही. महापालिकेत रात्र थोडी आणि सोंगे फार अशी व्यथा नूतन आयुक्त डॉ. भारूड यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्यासमोरच व्यक्त केली.