कोल्हापूर : आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूरचे विविध प्रश्न मार्गी लावले. अनेक वर्षे प्रलंबित असलेला 507 रोजंदारी कर्मचार्यांचा प्रश्न सोडवून त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनाकडून चांगले काम करून घेत 525 कोटींपेक्षा जास्त कर जमा केला, असे गौरवोद्गार आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या निरोप समारंभात मान्यवरांनी काढले.
शहराच्या प्रशासकीय कारभारात शांत, संयमी आणि तरीही ठाम नेतृत्वाची छाप उमटवणार्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना सोमवारी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यांत दाटलेले अश्रू अशा भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. त्यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते श्री अंबाबाई देवीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेता शारंगधर देशमुख, गटनेता इंद्रजित बोंद्रे उपस्थित होते.
महापौर निकम म्हणाल्या, आव्हानात्मक स्थितीतही आयुक्तांनी शहराला चांगले सांभाळले. विरोधी पक्षनेता राजेश लाटकर म्हणाले, संस्था प्रथम धरूनच निर्णय घेतल्याने त्यांची कारकिर्द उल्लेखनिय ठरली. नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, आयुक्तांनी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कामकाज चालवून आदर्श घालून दिला.
कर्मचारी संघाचे संजय भोसले म्हणाले, कर्मचार्यांचे अनेक प्रश्न सकारात्मक राहून त्यांनी सोडविले. यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे, अभियंता सुरेश पाटील यांचे मनोगत झाले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी आभार मानले.
कोल्हापूरची कारकिर्द अविस्मरणीय...
अंबाबाईच्या शहरातील लोकांची सेवा करायला मिळाली हे माझे भाग्य. इथला अनुभव कायमच पाठिशी राहील. महापालिका नवी इमारतीची पाच एकर जागा, रंकाळा सुशोभीकरण, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण आदी कामे मार्गी लागली. कोल्हापूरची कारकिर्द कधीच विसरणार नाही, असे के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.