कोल्हापूर : अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. यंदा विज्ञान आणि वाणिज्य (इंग्रजी) शाखेचा कटऑफ पाईंट एक टक्क्याने घसरला आहे. पहिल्या यादीत सुमारे 20 हजार विद्यार्थांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील 291 कनिष्ठ महाविद्यालये व 70 हजार 690 प्रवेश जागांसाठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीत जिल्ह्यातील 32 हजार 696 विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉक झाले. कोल्हापूर जिल्ह्यात 19334 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून यात विज्ञान शाखा 11666, वाणिज्य 3477 तर कला 3895 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दि. 3 जूनपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहेत. याचदरम्यान कागदपत्र पडताळणी, शुल्क भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. गुणवत्ता यादीत मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाचा आहे. ज्यांना पसंती क्रमानुसार प्रवेश मिळाला नाही, असे विद्यार्थी दुसर्या प्रवेश फेरीमध्ये अर्ज करू शकतात. प्रत्येक महाविद्यालयाला त्यांच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. 5 जून रोजी दुसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होईल. कोणत्याही विद्यार्थ्यास कागदपत्र उपलब्ध नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. मूळ गुणपत्रक नसले तरी ऑनलाईन प्रिंटवर प्रवेश देण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
कला शाखेचा कट ऑफ तीन टक्क्याने घसरला
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कला शाखेचा कटऑफ पाईंट तीन टक्क्याने घसरला आहे. डी.डी.शिंदे सरकार कॉलेज चालू वर्षीचा कट ऑफ (87.08) आहे. तर न्यू कॉलेजचा (80), स.म.लोहिया हायस्कूल व ज्यु.कॉलेजचा (78) टक्के कटऑफ पाईंट आहे.
कोल्हापूर विभागात 54 हजार प्रवेश निश्चित
कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. 2 लाख 2 हजार 980 प्रवेश क्षमता आहे. त्यातील 94 हजार 773 विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या फेरीत लॉक झाले. 54 हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणवत्तेनुसार महाविद्यालये मिळाली आहेत.