कोल्हापूर : केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत बुधवारी (दि. ३) संपली. या मुदतीअखेर कोल्हापूर जिल्ह्यात १३ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक ५ जूननंतर जाहीर होणार आहे.
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरल्यानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून यादीनुसार ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे तेथे निश्चित करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. पहिल्या गुणवत्ता यादीत नाव न आलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्याची संधी देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांच्या सुधारित पसंतीक्रमाच्या आधारे दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. विज्ञान शाखेत ८,२०१, कला शाखेत ३,०७९ आणि वाणिज्य शाखेत २,४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तसेच विविध आरक्षण व विशेष कोट्यांतून ८८९ प्रवेशांची नोंद झाली आहे.