चंदगड : चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी दोन दिवसापासून वळीव पाऊस झोडपून काढत आहे. असाच पाऊस तिलारी परिसरात शुक्रवारी (दि.८) सायंकाळी सुरू होता. यादरम्यान कळसगादे येथील एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. शिवाय त्याच्या खिशात मोबाईल होता, तो मोबाईल ही जळाला. त्याच्या कमरेखालील दोन्ही पायावरील भाग काळवंडून गेला होता.
त्याला वीज घासून गेली, अशी चर्चा होती. त्याबाबत अधिक माहिती अशी की, साईराज ज्ञानेश्वर दळवी (वय 16) हा आपल्या गावाजवळील चाळोबा पॉईंट्स नावाच्या शेताकडे आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी सोबत गेला होता. शेतातून म्हशी आणणार होता आणि त्याचे वडील गवत घेऊन येणार होते. यादरम्यान सायंकाळी चार वाजता त्याच्यावर शेतातच त्याला वीज घासून गेली. या दरम्यान त्याच्या खिशातील मोबाईलही जळाला. शिवाय कंबरेखालील दोन्ही पायांना काळे डाग पडले.
चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तो गावातच नववी मध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात बहीण, भाऊ, आई-वडील आजी असा परिवार आहे. सकाळी तो शाळेकडे जाऊन क्लास करून परतला होता. दुपारनंतर तो शेताकडे वडिलांना मदत करायला गेला होता, मात्र या दुर्घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.