कोल्हापूर

भोगावती साखर कारखाना वार्षिक सभा : अडचण असतानाही एफआरपीनुसार ऊसदर दिला; पी.एन.पाटील

backup backup

राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत असतानाही भोगावतीने एफआरपी नुसार ऊसदर दिला आहे. बरीच वर्षे बंद असल्याने तोट्यात असणारी डिस्टलरी कारखान्याने ताब्यात घेतली असून ती लवकरच चालू करीत आहोत.प्रतिवर्षी ५ ते ६ कोटींच्या कर्जाची रक्कम कमी केली असून जिल्हा बँकेच्या कर्जाचा व्याजदर १५ ऐवजी कमी करून ११ टक्क्यांवर आणला आहे.आमच्या कारकिर्दीतील संपूर्ण कारभार पारदर्शक व काटकसरीने झाला असल्यानेच कारखाना सुरळीत चालला आहे. असे प्रतिपादन भोगावतीचे अध्यक्ष,आमदार पी.एन.पाटील यांनी केले. ते भोगावती साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सभेवेळी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कारखाना वाचविण्यासाठी निवडणूक बिनविरोध करावी यावरच सर्वपक्षीय नेत्यांनी अधिक चर्चा करत तयारी दर्शविली. भोगावती हायस्कूलच्या मैदानावरील ही सभा खेळीमेळीत पार पडली.

स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष पाटील यांनी केले. त्यानंतर विषय पत्रिका वाचन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले.तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले.सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या आजी माजी संचालकासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाभिमानाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील यांनी एकेकाळी भोगावतीचा सुवर्णकाळ असल्याचे सांगून प्रत्येकजण कारखान्यावरील कर्जाचे दावे प्रतिदावे करीत आले.मात्र कर्जाचा डोंगर वाढतच गेला.प्रतिवर्षी ५० कोटींचा बोजा पडत आहे. ३२६ कोटी ६२ लाख कर्जातील कारखाना वाचविण्यासाठीची सर्वांनी मिळुन उपाययोजना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी सदाशिवराव चरापले, अशोकराव पवार,जनार्दन पाटील,पी. डी. चौगले,केरबाभाऊ पाटील,बी के डोंगळे,धैर्यशील पाटील कौलवकर,हंबीरराव पाटील,संतोष पोर्लेकर आदीनी चर्चेत सहभाग घेतला.आभार उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी मानले.

भोगावती शिक्षणबाबत शब्द पाळला नाही..

भोगावती शिक्षण मंडळाबाबत संस्थेचे अध्यक्ष जयसिंग हुजरे यांनी मात्र दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी केला.

अब्रुनुकसानीचे दावे मागे

भोगावतीच्या साखर विक्रीबाबत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात येणारे अब्रुनुकसानीचे दावे मागे घेत असल्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी जाहीर केले.

सायंब सडोलीचं नाव होऊदे…

कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांच्या नावावर बँक आँफ इंडीयाचे बारा कोटीचे कर्ज कारखान्यासाठी उचललेलं आहे,त्यामुळं त्यांच्या नावावरचं कर्ज फेडा,सडोलीचं नाव होऊदे असं पी.एन.यांना अशोकराव पवार यानी सांगतले,त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आ.पी.एन.पाटील यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT