मुदाळतिट्टा : भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर येथे सुरू असलेल्या संत बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेदरम्यान रविवारी दुपारी रस्त्यावर मोफत मिळालेली लस्सी प्यायल्यामुळे 43 भाविकांना अन्न विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे यात्रेच्या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी महंमद देशमुख यांनी दिली. या घटनेचा देवस्थान ट्रस्टशी कोणताही संबंध नसल्याचे विश्वस्त दिलीप पाटील यांनी स्पष्ट केले.
भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर येथे सुरू असलेल्या संत बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेदरम्यान रविवारी दुपारी रस्त्यावर मिळालेली लस्सी प्यायल्यामुळे 43 भाविकांना अन्न विषबाधा झाल्याची घटना घडली. यात्रेसाठी आलेल्या काही भाविकांनी रस्त्यावरील लस्सी घेतली होती. त्यानंतर रात्री संबंधित भाविकांना उलटी, मळमळ आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच बाधित भाविकांना तातडीने उपचारासाठी मुरगुड गारगोटी सरवडे आदमापूर मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यात्रेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि उष्णतेची तीव्रता असल्यामुळे तसेच बाहेरील अन्नपदार्थ सेवन केल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेला सुमारे साठ वर्षांची परंपरा असून दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. मात्र इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडल्यामुळे यात्रेच्या परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.आरोग्य विभागाकडून या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. लसीचे नमुने तपांसाठी घेतले असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले.
या घटनेत एकूण 43 भाविकांना त्रास झाला असून त्यापैकी 33 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरित 10 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी महंमद देशमुख यांनी दिली.
या घटनेचा देवस्थान ट्रस्टशी कोणताही संबंध नसल्याचे विश्वस्त दिलीप पाटील यांनी स्पष्ट केले. यात्रेला येणाऱ्या भाविकांनी रस्त्यावरील अन्नपदार्थ खाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन विश्वस्त दिलीप पाटील यांनी केले आहे.