Sangali - Kolhapur Highway  Online Pudhari
कोल्हापूर

Sangali - Kolhapur Highway | कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या 'चिंध्या'

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सुनील कदम

कोल्हापूर-सांगली या महामार्गाच्या गेल्या काही दिवसांत अक्षरशः चिंध्या झाल्या आहेत. परिणामी, या मार्गावरून जीवावर उदार होऊनच प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी दोन-दोन, तीन-तीन फुटांचे भले मोठे खड्डे पडले असून या खड्यांत आदळून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

या महामार्गाची दुरवस्था हा आजचा प्रश्न नाही, तर गेल्या जवळपास बारा वर्षापासून या भागातील नागरिकांच्या मागे लागलेले ते शुक्लकाष्ठ आहे. या मार्गावरील वाढती वाहतूक विचारात घेऊन २०१२ मध्ये या मार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार 'सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीला बीओटी तत्त्वावर हे काम देण्यात आले होते;

मात्र रस्त्याचे काम निम्मे अर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदार कंपनीने 'टोलचा टोला' उगारल्यामुळे शासन आणि संबंधित कंपनीत वाद निर्माण होऊन काम बंद पडले कालांतराने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला; पण तो निर्णय कागदावरच राहिला,

महामार्ग केंद्राकडे हस्तांतरित दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने २०२१ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून तो 'नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया 'कडे सुपूर्द केला. ऑगस्ट २०२३ मध्ये या महामार्गाच्या ८५० कोटी रुपये खर्चाच्या कामाला केंद्राची आणि नॅशनल हायवेच्या हाय पॉवर कमिटीचीही परवानगी मिळाली; पण अजूनतरी हे काम मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत.

प्रवाशांची हाडे खिळखिळी आणि वाहनांचा खुळखुळा !

सध्या या रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की, ती बघितल्यावर अंगावर काटा उभारल्याशिवाय राहत नाही. या महामार्गावर शिरोली फाट्यापासून ते पार सांगलीपर्यंत भलेमोठे शेकडो खट्टे पडले आहेत. काही खड्डे तर दोन-तीन फूट रुंदीचे आणि फूट-दीड फूट खोलीचे आहेत, रात्रीच्या वेळेत हे खड्डे दिसत नाहीत.

परिणामी, या खड्ड्यात वाहने आदळून वाहनरातील प्रवाशांची हाडे खिळखिळी होतात, त्यासोबत वाहनांचेही काही पार्ट मोडून पडतात, या खकुचांमध्ये आदळून- आपटून वाहनांचे पार्ट मोडून वाहने बंद पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी आणि वाहनधारक पावला- पावलावर शासन आणि प्रशासनाचा 'उद्धार' करताना दिसत आहेत.

पन्नास वर्षांचं नंतर बघू, आत्ताचं काय ?

शिरोली फाटा ते बसवान खिंड (२० कि. मी. चौपदरी), बसवान खिंड ते जैनापूरमार्गे अंकली (१२.३० कि.मी. दुपदरी), बसवान खिंड ते जयसिंगपूरमार्गे अंकली (१५ कि.मी. दुपदरी) आणि अंकली ते सांगली (४.७ कि.मी. चौपदरी) अशा स्वरूपाचा हा रस्ता आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे या रस्त्याच्या कामाला मंजुरी देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा शब्द दिला आहे की, असा रस्ता बनवून देती की, पुढील पन्नास वर्षांत या रस्त्यावर एकही खङ्का पडणार नाही. गडकरींच्या स्वप्नातील हा गुळगुळीत रस्ता केव्हा होईल तेव्हा होईल; पण सध्या सवाल आहे तो या महामार्गावर आज ठिकठिकाणी जी 'भगदाडं' पडली आहेत, त्याचं काय?

...ना घर का ना घाट का !

सध्या या रस्त्याची अवस्था 'धोवी का कुत्ता, ना घर का ना घाट का' अशी झाली आहे. सध्या हा रस्ता नॅशनल हायवे अॅथॉरिटी 'च्या ताब्यात असल्यामु‌ळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याबाबत काही अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांना या रस्त्याच्या डागडुजीवर खर्च करता येत नाही.

दुसरीकडे नॅशनल हायवे अॅथॉरिटीकडूनही या कामाचा काही मुहूर्त होताना दिसत नाही. मधल्यामध्ये संत्रस्त प्रवाशी आणि वाहनधारकांची अवस्था मात्र 'आई जेऊ घालिना आणि बाप भीक मागू देईना' अशी झाली आहे. त्यामुळे याबाबतीत केंद्र आणि राज्य शासनाने काही तरी मधला मार्ग काढून रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत किमान दुरुस्तीचे काम तरी करावे, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT