एकनाथ नाईक
कोल्हापूर : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेंतर्गत 23 फेब—ुवारी 2026 पासून 2,399 आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. ‘आयुष्मान कार्ड भारी, आरोग्याचं रक्षण करी’ अशी ही योजना आहे. या योजनेचा जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 136 रुग्णालयांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे. त्यापैकी 111 खासगी, तर 25 शासकीय रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. त्यापैकी शहरातील 39 खासगी व 4 शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच 82 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 17 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
आयुष्मान भारत कार्डधारक कुटुंबांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रति कुटुंब पाच लाख रुपये तसेच अतिरिक्त पाच लाख रुपये असे एकूण दहा लाख रुपयांपर्यंत उपचाराची तरतूद आहे. सीमाभागातील 856 गावांतील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांनाही पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ दिला जात आहे.
सन 2013 पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 1 हजार 275 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्यावर 1 हजार 122 कोटी 60 लाख 52 हजार 58 रुपयांचे मोफत उपचार झाले आहेत. जिल्ह्यातील 38 लाख 82 हजार कुटुंब योजनेसाठी पात्र असून, त्यापैकी 19 लाख 60 हजार कुटुंबांनी आयुष्मान कार्ड काढले आहे.
नोंदणी, माहिती व तक्रारीसाठी येथे संपर्क करा
रेशन कार्डधारक पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आशा, रुग्णालयातील आरोग्यमित्र, महा-ई-सेवा केंद्र, रेशन दुकानदार किंवा ऑनलाईन स्वत: काढता येते. उपचारादरम्यान अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक 155338 किंवा 18002332200 वर संपर्क साधावा. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोळखुंबे (8275095926), डॉ. रेणुका वडूलेकर (8275095811) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल.
उपचार देणे बंधनकारक
आपत्कालीन स्थितीत रुग्णालयाने रुग्णाला तत्काळ दाखल करून घेणे बंधनकारक आहे. रेशन कार्ड नसल्यास तहसीलदारांचा पात्रता दाखला सादर केल्यानंतर तात्पुरते आयुष्मान कार्ड दिले जाते. मात्र तीन दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.