कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकाचा तलवार, एडका आणि सत्तूरने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्री १० च्या सुमारास टेंबलाई मंदिराच्या पिछाडीस शाहू कॉलनी येथील निर्जनस्थळी घडली. सोहेब ऊर्फ साद मुबारक पठाण (वय २४, रा. मणेरमळा, उचगाव) असे मृताचे नाव आहे. पाच ते सहा मारेकऱ्यांनी सोहेबच्या शरीरावर १० ते १२ वार करून त्याच्या शरीराची चाळण केली होती.
मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आदित्य सुखदेव ओव्हळ (२४, रा. सुधाकर जोशीनगर), विशाल ज्ञानेश्वर सूर्यवंशी (२०, रा. बापूरामनगर, कळंबा), आयुष सदाशिव माने (२१, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) या तिघांसह दोघा अल्पवयीन संशयितांना अटक केली. याबाबतची फिर्याद वडील मुबारक अस्लम पठाण यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. सोमवारी रात्री सोहेब मित्रांसोबत निर्जनस्थळी मद्य प्राशन करत बसला होता. दरम्यान, हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी सोहेबवर हल्ला चढविला. तलवार, एडका व सत्तूरने सोहेबच्या पाठीवर, डोक्यात, मानेवर, पोटात १० ते १२ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्यावर हल्लेखोर पसार झाले. काही वेळातच सोहेबच्या मित्रांनी त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
रात्रीत हल्लेखोर ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे यांनी अवघ्या पाच तासांत हल्लेखोरांना त्याब्यात घेतले.