शिरोळ : चिंचवाड - अर्जुनवाड दरम्यान असलेल्या ओढ्यातून उदगाव येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून दूषित सांडपाणी नदीत मिसळत आहे. याचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यासह शेती व जनावरांच्या वर होत असून याप्रकरणी संतप्त नागरिकांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले.
उदगाव येथील अकिवाटे औद्योगिक वसाहतीतील रसायनिक्त पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने होत आहेत. या पाण्यामुळे अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कुटवाड येथील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसापासून दूषित पाणी नदीत मिसळत असून नदीला घाणेरडा वास येत आहे. यावरूनच सोमवारी अर्जुनवाड ग्रामस्थांनी प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांना बोलवून चांगलेच धारेवर धरले.
अधिकाऱ्यांना पाण्याचे पंचनामे करायला लावून औद्योगिक वसाहत मधील कारखान्यावर कारवाई करण्याबाबत मागणी केली. ही मागणी मान्य करण्यासाठी अधिकाऱ्यांना अर्जुनवाड येथील एका घरात कोंडून घातले. अखेर उदगाव येथील वसाहत मधील कार्यालयात मंगळवारी सकाळी दहा वाजता बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
आज अर्जुनवाड बंद
दूषित पाणी प्रश्न सोमवारी प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर अर्जुनवाड ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिली आहे. तसेच घालवाड, कुटवाड व कनवाड मधील नागरिकांनी यामध्ये सामील होऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता उदगाव येथील अकिवाटे औद्योगिक वसाहत मधील कार्यालयात बैठक होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.