आप्पाचीवाडी भाकणूक : तिसरे महायुद्ध होईल; निष्पाप लोकांचा बळी जाईल Pudhari Photo
कोल्हापूर

आप्पाचीवाडी भाकणूक : तिसरे महायुद्ध होईल; निष्पाप लोकांचा बळी जाईल

चीनचा भारतावर हल्ला होईल... भारतीय सैन्यदलाची प्रगती होईल...

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : मधुकर पाटील

श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे महाराष्ट्र-कर्नाटकासह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल (सोमवार) पहाटे हालसिद्धनाथांची पहिली तर आज (मंगळवार) पहाटे दुसरी भाकणूक झाली. वाघापुरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिध्दार्थ डोणे (महाराज) यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली. पाच दिवसांपासून सुरु असलेली ही यात्रा उत्साहात पार पडत आहे. सोमवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य व श्रीफळ अर्पण करुन आशिर्वाद घेतला. दरम्यान आज (मंगळवार) उत्सवस्थळी बसलेली पालखी उठल्यानंतर सायंकाळी या यात्रेची सांगता होणार आहे.

नाथांच्या भाकणुकीतून नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोणे (महाराज) यांनी, चालविन क्रिया चालविन, डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, बांधा आड बांध शिवा आड शिव. मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे, मेघाच्या पोटी आजार आहे. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाया, लागलाय दुनिया न्याहळु लागलाय, त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडला आहे. नऊ ते नम, सात ती भोंब बरोबर हाय, वाडी-कुर्लीचा आघात मोठा आहे. जगात झेंडा मिरवल, भोंब पोर्णिमेला माझा सोहळा निघतोय, चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय, कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला ३३ कोटी देवांचा दरबार भरतोय. आप्पाचीवाडी सोन्याची काढी आहे. वाडी-कुर्लीचा आगाद येथे नाथांचा दरबार भरला आहे. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील. हालसिद्धनाथांचा त्रिभुवनात जयजयकार चालेल, वाडी-कुर्लीच्या पुजारी-मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय. वाडी-कुर्लीच्या सबीन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बघशीला. हालसिद्धनाथांच्या बांधकामाला ३३ कोटी देवांचा आशीर्वाद आहे. अशाप्रकारे भाकणूक कथन केली.

नाथांची नवीन भविष्यवाणी....

दरम्यान नातांनी पहिल्या भाकणूकित सोमवारी जगातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल, टोळीयुद्ध चालेल, धुमसत राहील, भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल. तर दुसऱ्या भाकणुकीत मंगळवारी तिसरे महायुद्ध होऊन निष्पाप लोकांचा बळी जाईल. देशात समान नागरी कायदा येईल, बारा बाजार मोडून एक बाजार होईल, लाकूड सोन्याचे होईल, चालता-बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल, सूर्य-चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल, हालसिद्धनाथ तीर्थक्षेत्राच्या बांधकामासाठी ३३ कोटी देवांचा आशीर्वाद राहील, महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन होईल, जाती-धर्म बिघडून जात वैरत्व वाढेल, हाणामारी होतील, भारत-पाक सीमेवर रण धुमेल पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या कब्जात येईल आणि भारत मातेचा जयजयकार होईल, आगामी वर्षाचा दिवस आनंदात दावीन, कडधान्य उदंड पिकल, दीड महिन्याचे पीक येईल, जगातील तापमान उच्चांकी वाढ होऊन जंगलांना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील, वस्त्रोद्योग अडचणीत येईल, गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील, ऋतुमानात बदल होईल,काँग्रेस पक्षात फूट पडेल, राजकारणात भगवा फडकेल, चीनचा भारतावर हल्ला होईल. भारतीय सैन्यदलाची प्रगती होऊन नवीन तंत्रज्ञान येईल. असे सांगत नाथांनी धोक्याचा इशारा देत काही अंशी भक्तांना दिलासाही दिला.

सत्यात उतरलेली भाकणूक.....

विशेष म्हणजे नाथांनी गेल्या दोन वर्षापुर्वी देशात समान नागरी कायदा येईल, असे सांगून एका अर्थाने नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत हालचाली चालवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला नाथांनी जगातील तापमान वाढेल, जंगलाना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट पावेल, वस्त्रोद्योग अडचणीत येईल तसेच यामधील दलाल दिवाळ काढेल, पावसापाण्यामुळे शेती हंगाम बदलेल. शिवाय चीनचा भारतावर हल्ला होईल असे सांगितले होते. त्यानुसार कोरोना सारखी जैविक महामारी असो अथवा भूप्रदेश वाद उकरून काढत चीन भारतासोबत युद्धाची भाषा आजही करतच आहे. अर्थात चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात अनेकांना प्राण गमवावे लागले. यासह आजतागायत खरी ठरलेली भाष्यवाणी यामुळे नाथांची भाकणूक सत्यात उतरत असल्याचे वास्तवात दिसत आहे.

यंदाही भाकणुकीची वेळ लांबली...

विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून भाकणूककार भगवान डोणे (महाराज) यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (महाराज) हे पहिली व दुसरी भाकणूक कथन करीत असून, यंदाही मात्र सिद्धार्थ यांनी पहिली भाकणूक लयबद्ध अशा सुरात पहाटे सविस्तररीत्या ४:३५ ते ६.१५ या वेळेत कथन केल्याने भाकणुकीची वेळ लांबली गेली.

सर्वधर्म समभावाचे प्रतिक

श्रीक्षेत्र हालसिद्धनाथांच्या दर्शनासाठी सर्व जातीधर्माचे भाविक येतात. हालसिद्धनाथांच्या यात्रेमध्ये मोठ्याप्रमाणात भंडाऱ्याची उधळण होत असते. नाथांच्या समाधीस्थळी विजापूरच्या अली आदिलशाहने घुमटाची मशीद बांधली असून या ठिकाणी पुजारी म्हणून मुस्लिम आहेत. नाथांच्या इतर ठाण्यांवर हिंदू मंदिरे असून त्याठिकाणी धनगर पुजारी आहेत. नाथांच्या समाधी स्थळावरील पूजा, उत्सव हे मुस्लीम पद्धतीने होतात. तर इतर ठिकाणी हिंदू पद्धतीने होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT