कोल्हापूर : आंबेवाडी येथे बुधवारी रात्री गावच्या सरपंचांचे पती व दिरावर झालेल्या तलवार हल्लाप्रकरणी करवीर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. हर्षवर्धन शरद सुतार (वय 25), विशाल सुभाष फाळके (25, दोघेही रा. रजपूतवाडी, ता. करवीर), रजत राजाराम गुरव (20, रा. पोहाळे, ता. पन्हाळा) यांसह अन्य दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी हर्षवर्धन आणि विशाल हे मारहाणीत जखमी झाल्याने त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. तर दोन अल्पवयीनांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
आंबेवाडी (ता. करवीर) येथे शेतात मद्य प्राशन व गांजा सेवन करणार्या तरुणांना येथे दारू पिण्यास बसू नका असे सांगत मारुती गणपती पाटील व तुकाराम गणपती पाटील यांनी हटकले होते. तसेच याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून हे तरुण बुधावारी रात्री 8.30 च्या सुमारास प्रयाग चिखली रोडवरील पाटील गल्लीनजीक असलेल्या तुकाराम पाटील यांच्या किराणा दुकानासमोर आले. त्यांनी पाटील यांना पोलिसांत तक्रार दिल्याचा जाब विचारत दुकानात घुसून मारहाण केली.
मारहाणीमध्ये त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये तुकाराम यांच्या हाताचे बोट तुटले. तर हल्लोखोरांना रोखण्याचा प्रयत्न करताना माजी सरपंच मारुती पाटील यांच्याही खांद्यावर, कोपरावर तलवारीचा वार झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, येथे जमलेल्या ग्रामस्थांनी हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये दोन हल्लेखोर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्यांना ताब्यात घेणार असल्याचे करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.