देवरुख : रत्नागिरी व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट सद्य:स्थितीला अवजड वाहने, खासगी लक्झरी बसेस यांच्यासाठी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. या घाटात दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या खालील दरडीचा भाग कोसळला होता. मात्र वाहतुकीला अडथळा नसल्याचे निष्पन्न झाल्याने हा मार्ग एकेरी स्वरूपात सुरू ठेवण्यात आला आहे.
आंबा घाट गेले तीन महिने वाहतुकीच्या अडथळ्यात अडकला आहे. आजपर्यंत या मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत होते. संबंधित ठेकेदारही दरड बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून देत होते.
मात्र एक महिन्यापूर्वी दोन्ही बाजूंनी दरड असलेल्या ठिकाणी रस्ता खराब होत होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला होता.
यानंतर कोल्हापूर व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व स्थानिक आमदार किरण सामंत यांनी या मार्गाची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. यानंतर हा मार्ग एकेरी स्वरूपात फक्त चारचाकी वाहने व दुचाकी वाहने तसेच एसटीसाठी खुला करून देण्यात आला. गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे हा मार्ग खुला करून देण्यात आला आहे.