कोल्हापूर : अलमट्टी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हे धरण ९६.०५ टक्के भरले होते. धरणांत ११८ टीएमसी पाणीसाठा झाला असून येत्या दोन-तीन दिवसांत हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
अलमट्टी धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरूच असून बुधवारी सकाळी धरणाची पाणी पातळी ५१९.३२ मीटरपर्यंत गेली. १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणी पातळी ५१७ ते ५१७.५० मीटरपर्यंत ठेवण्याचा निर्णय आतंरराज्य समन्वय समितीच्या बैठकीत यापूर्वी झाला आहे; मात्र अलमट्टी प्रशासनाने त्याला कोलदांडा दाखवत यावर्षी जुलै महिन्यातच ही मर्यादा ओलांडत पाणी पातळी ५१९.३२ मीटरपर्यंत नेऊन ठेवली आहे.
धरणात सध्या ६८ हजार ५२५ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ६४ हजार ६१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असला, तरी सध्याची पाणी पातळी आणि ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली परिसरात पावसाचा अंदाज पाहता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा धोका आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवून पाणी पातळी १५ ऑगस्टपर्यंत तरी ५१७ ते ५१७.५० मीटरपर्यंत नियंत्रित ठेवा, अशी मागणी होत आहे.