कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून, याबाबत बुधवारी (दि. 21) राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात दुपारी 3 वाजता बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणार्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढलेला आहे. या महापुरामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पूरबाधित होत असून, अनेक गावांतील जनतेला स्थलांतर करावे लागते. परिणामी, दीड ते दोन महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान या महापुरामुळे झालेले आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो, त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे.
याच दरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालींमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पुराचा धोका आणखी वाढणार आहे. याप्रश्नी राज्य शासन अलमट्टी धरणाच्या विरोधात ठामपणे असून, प्रसंगी न्यायालयीन लढाईदेखील लढण्यासाठी सज्ज आहे. पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.