कोल्हापूर : विधानसभेतील वातावरणाने सोमवारी सर्वजण भावुक झाले. श्रद्धांजलीपर प्रस्तावावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांना स्व. अजित पवार यांच्या आठवणी सांगताना गहिवरून आले.
ते म्हणाले, 1999 साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत मंत्रिपदाची संधी मिळाली. कोल्हापूरमध्ये दोन ज्येष्ठ मंत्री असतानाही मला तिसरा मंत्री करण्याचे धाडस अजित पवार यांनी करून दाखवले. आजपर्यंत मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रत्येक वेळी अजित पवार हसत म्हणायचे, ‘मुश्रीफसाहेब, माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच!’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावावर भावना व्यक्त करताना मुश्रीफ यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आणि सभागृहात क्षणभर शांतता पसरली.
अजित पवारांची आठवण सांगताना मुश्रीफ म्हणाले, सभागृहातील प्रत्येक आमदाराकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. हजरजबाबीपणा, कडक शिस्त आणि वेळेची अचूक जाण, यामुळे ते जणू सभागृहाचे ‘हेडमास्तर’च होते. कोणतीही बैठक असो, अर्धा तास आधीच त्यांचा फोन खणाणायचा; सर्वांना वेळेत उपस्थित राहणे भागच असायचे.
रोखठोक स्वभाव, कामात पारदर्शकता
‘जे पोटात तेच ओठात’ हा त्यांचा स्वभाव. स्वतः टापटीप राहणारे अजित पवार दुसर्यांकडूनही तशीच अपेक्षा ठेवत. योग्य काम असेल तर गट, पक्ष, जात-धर्म यांचा विचार न करता ते तातडीने निर्णय घेत. अधिकार्यांवर त्यांचा प्रचंड वचक होता; पण तो केवळ लोकांच्या हितासाठी. बारामतीमधून सलग आठवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येणे, हे त्यांच्या नेतृत्वाचेच द्योतक होते.