सुनील कदम
कोल्हापूर : एकेकाळी केवळ विज्ञान कथांमध्ये आढळणारे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, आता सायबर गुन्हेगारांच्या हातातले सर्वात धोकादायक हत्यार बनले आहे. एआयच्या मदतीने सायबर हल्ले अधिक प्रभावी आणि सहज होत असल्याने जगभरात सायबर गुन्हेगारीत तब्बल 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संगणक साक्षरतेत आधीच मागे असलेल्या भारतासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असून, एआय साक्षरता आता काळाची गरज बनली आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठित सायबर सुरक्षा संस्था ‘चेक पॉईंट रिसर्च’ने आपल्या अहवालात एआयमुळे वाढलेल्या सायबर गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा निष्कर्ष भारतासाठी अत्यंत चिंताजनक आहे,
सर्वाधिक बळी भारतात : भारतातील तब्बल 68% इंटरनेट वापरकर्ते कधी ना कधी सायबर गुन्हेगारीचे बळी ठरले आहेत. हेच प्रमाण अमेरिकेत 49%, ऑस्ट्रेलियात 40% आणि जपानमध्ये केवळ 21% आहे.
महाराष्ट्राला मोठा धोका : देशात सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये येतो. राज्यातील कमी संगणक साक्षरता हे यामागील प्रमुख कारण मानले जाते.
साक्षरतेचा अभाव : सायबर चोरांना मोकळे रान देशातील सुमारे 90 कोटी लोक आज इंटरनेट वापरतात; मात्र त्यातील निम्मेही पूर्णपणे संगणक साक्षर नाहीत. केवळ जुजबी माहितीच्या आधारे ऑनलाईन व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत, एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीची माहिती तर नगण्यच आहे. हीच गोष्ट सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत असून, ते सामान्य नागरिकांना सहजपणे आपले लक्ष्य बनवत आहेत.
सायबर गुन्हेगाराचा माग काढणे हे पोलिसांसाठी आधीच एक मोठे आव्हान आहे. गुन्हेगार जगाच्या कुठल्या कोपर्यातून हल्ला करतो, हे शोधणे कठीण असते. त्यामुळेच सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे आणि गुन्हेगाराला शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ 15 ते 20 टक्के आहे. आता एआयच्या वापरामुळे पोलिसांपुढील आव्हान दुप्पट झाले आहे. एआय वापरून केलेले हल्ले ओळखणारी व त्यांना तोंड देणारी परिपूर्ण यंत्रणा सध्या देशात उपलब्ध नाही. अशावेळी सायबर गुन्हेगारांनी मोठे हल्ले केल्यास शासकीय यंत्रणांची तारांबळ उडते.