कोल्हापूर : कोल्हापुरात बुधवारी मध्यरात्री अग्निवीर भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. यासाठी ९०० युवक धावले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते मध्यरात्री भरती प्रक्रियेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने उमेदवार भरतीसाठी दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया २९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, भरती प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. भरती मैदानाची तयारी पूर्ण झाली असून, उमेदवारांसाठी विशेष वैद्यकीय पथक तैनात केले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उमेदवारांसाठी अल्पोपहार आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. भरतीस्थळी येणाऱ्या उमेदवारांच्या वाहतुकीची व्यवस्थाही केली आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानक येथून भरतीस्थळापर्यंत केएमटीच्या विशेष बससेवेची सुविधा उपलब्ध केली आहे.
भरतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांकडून भरती परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारांच्या हालचालींसह परिसरातील सुरक्षेवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि पोलिसांच्या समन्वयातून भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जात आहे.
या वेळी सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल प्रशांत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, लेफ्टनंट कर्नल डॉ. संबित पात्रा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार, तहसीलदार स्वप्निल पवार, सहायक संचालक आर्मी भरती कार्यालय सुभेदार मेजर लखविंदर सिंग यांच्यासह लष्करी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या नियोजनाचे लष्करी अधिकाऱ्यांकडून कौतुक
कर्नल प्रशांत सिंग यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेच्या नियोजनाचे कौतुक केले. भरती रॅलीचे आयोजन उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.