कोल्हापूर : सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. आयोग, कायदे मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिजिटल साक्षरता अभियान यशस्वी होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. प्रशिक्षण मोहीम अधिक संवादात्मक करून नागरिकांचा सहभाग वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्य महिला आयोग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थी, महिला व शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षा आणी जनजागृतीसाठी डिजिटल इम्युनिटी उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी सकाळी मंत्री तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव पद्मश्री बनाडे प्रमुख उपस्थित होते.
खासदार महाडिक यांनी माध्यमिक शाळांमध्ये आठवड्यातून एक तास डिजिटल सुरक्षेसाठी राखीव ठेवावा तसेच या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग वाढवण्याची सूचना केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर नकारात्मक कारणांसाठी न करता सकारात्मक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन केले.
अहान फाऊंडेशनच्या सोनाली पाटणकर, उन्मेष जोशी यांनी सायबर सुरक्षितता, सायबर कायदे, डिजिटल सुरक्षा आणि सायबर वेलनेस या विषयी तर, गुगल इंडियाचे समीर जाधव यांनी ‘गुगल किडस् ट्रस्ट अँड सेफ्टी’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर ‘महातत्त्व’च्या दीप्ती सहानी यांनी गुगल सेफ्टी टूल्सविषयी विशेष सत्र घेतले. नंदिनी आवडे यांनी स्ताविक केले.