बिरू व्हसपटे
शिरढोण : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणारे ‘आपले सरकार’ पोर्टल तब्बल नऊ दिवसांपासून बंद असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल पासून पोर्टलची सेवा खंडित झाली आहे. तांत्रिक देखभाल व अद्ययावत कामांसाठी २ ते५ एप्रिल दरम्यानही सेवा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र अद्यापही ही सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील सेवा या पोर्टलद्वारे दिल्या जात असल्याने त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. महाआयटीने विकसित केलेले हे पोर्टल नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सर्व्हर डाऊनमुळे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. आपले सरकार’ व ‘सेतू’ केंद्र चालकांकडे नागरिक हेलपाटे मारत असल्याने त्यांच्या कामावरही परिणाम होत आहे.
दरम्यान, या कालावधीत सार्वजनिक सुट्ट्यांचा अपवाद वगळता कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रशासनावर टीका होत आहे. नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता, संबंधित यंत्रणांनी तातडीने पोर्टल सुरू करून सेवा सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
शेतकरी व ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका...
‘आपले सरकार’ पोर्टल बंद पडल्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. पीक कर्जासाठी आवश्यक दाखले, जमीनसंबंधित कागदपत्रे व इतर शासकीय सेवा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत आहे. माहिती व साधनांच्या अभावामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसोय अधिक वाढत असून, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.