कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून नव्या मुंबईसाठी सेवा सुरू झाली. यामुळे विमानतळावरून आठवड्याला आता 90 विमानांचे टेकऑफ-लँडिंग होत आहे. विमान फेर्यांची संख्या वाढली, तरी प्रवासी वाढीची चिंता आहे, त्यात अपेक्षित वाढ झाली नाही, तर काही फेर्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आता याकरिता सामूहिक प्रयत्नांचीही गरज आहे.
कोल्हापूर विमानतळ आता भरारी घेऊ लागले आहे. मुंबईसाठीची सेवा वाढवा, अशी मागणी होती. त्यानुसार त्यात आता वाढ झाली आहे. यामुळे आता मुंबई परिसरात जाण्यासाठी आठवड्यातील चार दिवस सकाळी दोन, सायंकाळी एक आणि रात्री एक अशी चार, तर मुंबई परिसरातून कोल्हापूरला येण्यासाठी सकाळी दोन, सायंकाळी एक आणि रात्री एक अशी चार तर अन्य तीन दिवस जाण्यासाठी तीन, तर परत येण्यासाठी तीन विमानांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
विमानतळावरून दोन वर्षांपूर्वी एकाच दिवशी 721 प्रवाशांची ये-जा झाली होती. त्यानंतर (दि. 4) एप्रिल रोजी ही आकडेवारी ओलांडली गेली. या दिवशी आजपर्यंतची 774 इतकी सर्वाधिक प्रवाशी संख्या झाली. सध्याच्या विमानफेर्यांची संख्या पाहता, दैनंदिन प्रवासी संख्या ही 600 ते 1,000 पर्यंत जाण्याची आवश्यकता आहे.
या मार्गांवर आहेत सेवा
कोल्हापूर-हैदराबाद-तिरूपती (दैनंदिन)
कोल्हापूर-बंगळूर (दैनंदिन)
कोल्हापूर-मुंबई (दैनंदिन सकाळी, आठवड्यातून चार दिवस सकाळ-संध्याकाळ)
कोल्हापूर-नवी मुंबई (दैनंदिन सकाळ- संध्याकाळ)
कोल्हापूर- अहमदाबाद-किशनगड (आठवड्यातून चार दिवस)
नाईट लँडिंगचा नियमित वापर
विमानतळावर 3 नोव्हेंबर 2022 पासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली. यानंतर रात्रीची नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होण्यास सुमारे 3 वर्षे 5 महिन्यांचा कालावधी उलटला.