कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून १५ दिवसांसाठी हद्दपार केलेल्या ९ गुंडांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आदेशाचा भंग करून हद्दीत वावरताना अटक केली. राजारामपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
राजारामपुरी परिसरात केलेल्या कारवाईत अजय अनिल पाथरवट (वय २६, रा. सायबर चौक), अल्ताफ अकबर देवडी (२६, रा. यादवनगर), करण उदय सावंत (२५, रा. राजारामपुरी), मंदार मधुकर दिडे (२५, रा. यादवनगर) अविनाश शांताराम कोकाटे (२७, रा. मोतीनगर) आणि अमोल नंदू हळदीकर (३९, रा. टेंबलाई नाका) या सहा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत विशाल बबन जाधव (३२), सौरभ दीपक कांबळे (२७) आणि सिद्धेश विनायक कांबळे (२३) या तिघांना ताब्यात घेतले.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील ९७२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यापैकी काही सराईत गुन्हेगार हद्दीतच वावरत असल्याचे गेल्या चार दिवसांतील कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गणेशोत्सव काळात शहरात घुसणाऱ्या हद्दपार गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. हे पथक गस्त घालत असताना हे नऊ सराईत गुन्हेगार हद्दीत वावरत असल्याचे दिसून येताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.