कोल्हापूर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनें’तर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १२ हजार ९१४ शेतकर्यांच्या बँक खात्यावर ८८ कोटी ९९ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली आहे. पुढील ४८ तासांत संबंधित शेतकर्यांची बँक खाती निरंक करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी दिली.
जिल्ह्यातील ४१,५५२ शेतकर्यांच्या कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली आहे. यापैकी २६ हजार ९९७ शेतकरी पहिल्या यादीत कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. यापैकी १८,३७३ शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ८,६२४ शेतकर्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. पहिल्या टप्प्यात रक्कम जमा झालेल्या १२,९१४ शेतकर्यांपैकी ११ हजार १९८ शेतकर्यांची बँक खाती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत. त्यांना ७३ कोटी ४१ लाख रुपये; तर १,७१६ शेतकरी हे राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार असून, त्यांना १५ कोटी ५८ लाख रुपये कर्जमाफी मिळाली आहे. अद्याप १४ हजार शेतकरी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.