2024 मध्ये आजअखेर 283 जणांना सर्पदंश  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : 5 वर्षांत 7 हजार 275 जणांना सर्पदंश

जिल्ह्यात आठजणांचा मृत्यू; दोन वर्षांत 322 महिलांना दंश

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ नाईक

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत 7 हजार 275 जणांना संर्पदंश झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला. गतसाली 901 तर 2024 मध्ये आजअखेर 283 जणांना सर्पदंश झाला. या दीड वर्षात 322 महिलांना सर्पदंश झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि सीपीआरमध्ये सर्पदंश प्रतिबंधात्मक (एएसव्ही) लसीचा मुबलक साठा उपलब्ध ठेवला आहे.

सीपीआरकडे सर्पदंशाच्या 1 हजार 500, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांकडे, सामान्य रुग्णालयाकडे 1 हजार 786, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 2 हजार 77 सर्पदंश प्रतिबंधक लसीच्या व्हाईल उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या कालावधीत सरपटणार्‍या प्राण्यांकडून होणार्‍या दंशावर पुरेशा प्रमाणात औषधसाठा आरोग्य विभागाने उपलब्ध करून ठेवला आहे. दंश झालेल्या रुग्णांच्या देखभाल व उपचारांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अहोरात्र सेवा उपलब्ध असून आरोग्य कर्मचार्‍यांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्हात शल्य चिकित्सक विभागाच्या अंतर्गत 16 ग्रामीण रुग्णालये, 4 उपजिल्हा रुग्णालये आणि 1 सामान्य रुग्णालय अशा 21 आरोग्य केंद्रांचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत 76 प्राथमिक केंद्रे कार्यकरत आहेत. येथे सर्पदंश, विंचू, श्वानदंश यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातील पन्हाळा, गगनबाडा, शाहूवाडी, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, कागल, करवीर तालुक्यात सर्पदंश तर कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, हातकणंगले, आजरा, शिरोळे श्वानदंश झालेल्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे बाह्यरुग्ण नोंदणीवरून लक्षात येते. 2023 व 3 जुलै 2024 अखेर सर्पदंशामुळे नागरिकांचा मृत्यू नाही. वेळेत रुग्णालयात दाखल आणि उपचार यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. सर्पदंश, विंचू दंश झालेल्या रुग्णाला ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. येथे त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. विषामुळे रुग्ण गंभीर झाल्याचे लक्षात येताच त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले जाते. बिनविषारी सर्पदंश असल्यास रुग्णाला देखरेखीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीतील रुग्णालयांना धास्ती

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीत येणार्‍या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय यांनी सर्पदंशाची धास्ती घेतली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध असतानाही रुग्णाला सीपीआरकडे पिटाळले जाते. सीपीआरमध्ये सर्पदंशाचे महिन्याला 40 ते 50 रुग्ण दाखल होतात. यामध्ये बहुसंख्य रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT