कोल्हापूर

Hajj Yatra 2024 : कोल्हापूरचे 450 यात्रेकरू सुरक्षित; सांगलीच्या महिलेचा मृत्यू?

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हज यात्रेसाठी गेलेले कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 450 यात्रेकरू सुरक्षित असून, दररोज त्यांच्याशी संवाद साधला जात असल्याची माहिती हज कमिटी व हज फाऊंडेशनतर्फे देण्यात आली. दरम्यान, उष्माघाताने सांगली जिल्ह्यातील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हज यात्रेसाठी जगभरातील लाखो भाविक एकवटले असून, उष्माघातामुळे शेकडो भाविक मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील हज यात्रेकरूंबाबतची चिंता त्यांच्या नातेवाईकांना लागली आहे. याबाबत कोल्हापुरातील हज कमिटी, हज फाऊंडेशन आणि लिंब—ास चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून हज यात्रेला गेलेल्या कोल्हापुरातील भाविकांच्या सुरक्षिततेची माहिती घेण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातून हज कमिटीच्या माध्यमातून 319, तर खासगी यात्रा कंपनीच्या माध्यमातून सुमारे 125 यात्रेकरू हजला गेले आहेत. सांगली जिल्ह्यातून सुमारे 286 आणि सातारा जिल्ह्यातील 125 यात्रेकरूही रवाना झाले असून, यात बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. हजमध्ये तापमानाचा पारा 48 ते 50 अंशांवर पोहोचला आहे. असे असतानाही तेथील काही धार्मिक विधी करण्यासाठी भाविक प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता, नियम मोडून भरदुपारी बाहेर पडत आहेत. यामुळे भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागल्याची माहिती हजमधील हज कमिटी ऑफ इंडियाचे सीईओ लियाकत आफाकी यांनी दिली.

बेपत्ता झालेले कोल्हापूरकर सापडले

हज यात्रेत उष्माघातामुळे उडालेल्या गोंधळात कोल्हापुरातील अस्लम बागवान व त्यांच्यासोबतचे चौघेजण गर्दीत बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधमोहिमेनंतर सर्वजण सुरक्षित असून, त्यांच्याशी संपर्क करण्यात आल्याची माहिती हज फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT