कोल्हापूर : जिल्ह्यातील मतदार यादीतून सुमारे ४ लाख ४८ हजार नावे वगळली जाणार आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) ४९ दिवस चाललेले मतदार पडताळणीचे काम सोमवारी रात्री पूर्ण झाले. यामुळे ज्यांनी गणना अर्ज भरून दिले नाहीत, अशी सर्व नावे आता रद्द होतील. या नावांसह पडताळणीदरम्यान ज्यांच्या नावांचे २००२ च्या मतदार यादीशी योग्यप्रकारे मॅपिंग झालेले नाही, असे सुमारे १ लाख १५ हजार, तर ज्यांच्या तपशिलात विसंगती आहे, असे १ लाख ३५ हजार अशा सुमारे २ लाख ५० हजारांवर मतदारांवरही टांगती तलवार आहे. या मतदारांची दि. २४ नंतर सुनावणी घेतली जाणार आहे. मध्यरात्री १२ नंतर हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नेमकी आकडेवारी स्पष्ट होईल.
जिल्ह्यात ‘एसआयआर’ प्रक्रियेला ३० जून रोजी प्रारंभ झाला होता. ३ हजार ४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून जिल्ह्यातील ३३ लाख ५५ हजार २४४ इतक्या मतदारांची पडताळणी करण्यात आली. या मतदारांना मतदान गणना अर्जांचे वाटप करून ते त्यांच्याकडून भरून घेण्यात आले. जमा झालेल्या अर्जांचे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर स्कॅनिंग करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत तब्बल ४ लाख ४९ हजार गणना अर्ज जमा झाले नाहीत. यामुळे ज्या मतदारांचे अर्ज परत आले नाहीत, त्यांची नाव मतदार यादीतून मध्यरात्रीनंतर वगळण्यात आली.
मतदार पडताळणी पूर्ण झाली असून, दि. २४ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या यादीत २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग न झालेले, तसेच वेगवेगळ्या विसंगती असलेल्या सुमारे २ लाख ७० हजार मतदारांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मतदारांची सहायक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत संबंधितांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. यानंतर संबंधितांची नावे मतदारयादीत राहणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर दि. २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.