कोल्हापूर : प्रसूती म्हणजे एका नव्या जीवाला जन्म देणे. या काळात महिलांचा एक प्रकारे पुनर्जन्मच होतो. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीच्या काळात मातांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही दरवर्षी माता मृत्यू होण्याच्या घटना कायम आहेत. कोल्हापूर विभागात २०२२ ते २०२६ या पाच वर्षांत प्रसूती काळात एकूण २७१ माता दगावल्या आहेत.
गर्भवतींना आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना आशा वर्कर्स देत असतात, तरीदेखील अजूनही माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यात अपयश आले आहे. माता मृत्यू होण्याचे प्रमाण ग्रामीणसह शहरी भागातही आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीत ग्रामीण व शहरी भागातील माता मृत्यू होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. उच्च शिक्षण, लग्नासाठी वाढते वय यामुळे शहरामध्ये मुलींमध्ये गर्भधारणेपासून ते प्रसूती काळापर्यंत समस्या दिसून येतात. शारीरिक कष्ट, गरोदरपणात आहाराकडे दुर्लक्ष, कमी अंतराने राहणारी गर्भधारणा यामुळे ग्रामीण भागातील प्रसूती काळात धोका निर्माण होत आहे.
गर्भावस्थेदरम्यान लोह, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम योग्य प्रमाणात आहारातून घेणे, दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी करणे, गर्भवती काळात होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष करू नये, अतिशारीरिक कष्टाची कामे टाळणे गरजेचे आहे. माता मृत्यूसाठी सध्या महत्त्वाचे कारण म्हणजे प्रसूतीपूर्व उच्च रक्तदाब, अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग आणि रक्तक्षय ही कारणे आहेत.
मातेला तीन टप्प्यांत ५ हजार रुपयांची मदत
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना प्रसूतीनंतर आर्थिक मदत देणारी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, गर्भवती काळातील तपासणी, प्रसूतीपूर्व सेवा, समुपदेशन, जोखमीनुसार चाचणी यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू आहे. प्रत्येक गर्भवती महिलेची नोंदणी करून प्रसूतीनंतर तीन टप्प्यांत पाच हजार रुपये आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे.