कोल्हापूर : प्रसूती म्हणजे एका नव्या जीवाला जन्म देणे. या काळात महिलांचा एकप्रकारे पुनर्जन्मच होतो. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीच्या काळात मातांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही दरवर्षी माता दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. 2024-25 वर्षांमध्ये जिल्ह्यात एकूण 26 माता दगावल्या. यामध्ये कोल्हापूर शहरातील 19, तर ग्रामीण भागातील सहा मातांचा समावेश आहे. 2023 - 25 या तीन वर्षांत एकूण 63 मातांचा मृत्यू झाला आहे. गर्भवतींना आरोग्य विभागाकडून दिल्या जाणार्या सूचना आशा वर्कर देत असतात, तरीदेखील अजूनही माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यात अपयश आले आहे.
माता मृत्यू होण्याचे प्रमाण ग्रामीणसह शहरी भागातही आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीत ग्रामीण व शहरी भागातील माता मृत्यू होण्याची कारणे वेगळी आहेत. उच्च शिक्षण, लग्नासाठी वाढते वय यामुळे शहरी मुलींमध्ये गर्भधारणेपासून ते प्रसूतीकाळापर्यंत समस्या दिसून येतात. शारीरिक कष्ट, गरोदरपणात आहाराकडे दुर्लक्ष, कमी अंतराने राहणारी गर्भधारणा यामुळे ग्रामीण भागातील मातांना प्रसूतीकाळात धोका निर्माण होत आहे.
गर्भावस्थेदरम्यान लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम योग्य प्रमाणात आहारातून घेणे, दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी करणे, गर्भवतीकाळात होणार्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष न करणे, अतिशारीरिक कष्टाची कामे टाळणे गरजेचे असून सद्यःस्थितीत माता मृत्यूसाठी प्रसूती पूर्व उच्च रक्तदाब, अतिरक्तस्राव, जंतू संसर्ग आणि रक्तक्षय ही कारणे आहेत.
आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना प्रसूतीनंतर आर्थिक मदत देणारी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, गर्भवती काळातील तपासणी, प्रसूतीपूर्व सेवा, समुपदेशन, जोखमीनुसार चाचणी यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू आहे. प्रत्येक गर्भवती महिलेची नोंदणी करून प्रसूतीनंतर तीन टप्प्यांत पाच हजार रुपये आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे.