कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने ठेवीदारांच्या ठेवींत बनावट कागदपत्राद्वारे 24 कोटी 69 लाख 553 हजार 849 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सहकार खात्यास दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.
आमदार क्षीरसागर यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करून ठेवीदारांच्या ठेवींचे पैसे मिळणार का, आणि दोषींवर काय कारवाई करणार, अशी विचारणा केली आहे. यावर संबंधित मंत्र्यांनी ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात सहकार खात्याने पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन याबाबतची माहिती मागितली आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, संचालक, मानद सचिव, मयत व्यवस्थापक, प्रभारी व्यवस्थापक, लेखापरीक्षक, इतर असे एकूण 34 जणांनी 24 कोटी 69 लाख 53 हजार 849 रुपयांचा अपहार केल्याचे अहवालात नमूद केले आहे.