पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यात मागील दीड आठवड्यांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरवासी त्रस्त झाले होते. पंचगंगेच्या पाणीपातळी सातत्याने वाढत होती. तसेच पूराचे पाणी शहरातील प्रमुख मार्गांवर आले होते. रविवारी सर्वांप्रमाणे पावसानेसुद्धा सुट्टी घेतल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. महापूराने कोल्हापूरच्या उंबरट्यावर येवून सर्व नागरिकांच्यावरती टांगती तलवार ठेवली होती. रविवारी (दि.28) पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगेची पातळी इंचा-इंचाने कमी होत आता 11 इंचाने कमी झाली आहे.
शनिवारी (दि.27) 7 वाजता पंचगंगेची ही पाणीपातळी 47 फुट 8 इंचावर होती. ती रविवारी कमी होवून 46 फुट 9 इंचावर येवून ठेपलेली आहे. त्याचबरोबर शनिवारी जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. आता दिवसभर पाऊस थांबल्यामुळे 10 बंधाऱ्यांवरील पाणीपातळी ओसरली असून थोड्या गावांचा संपर्क पुर्ववत झाला आहे. तसेच अनेक मार्ग वाहतूकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना महापूरापासून मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळी 6 वाजता पाणी पातळीत घट होण्यास सुरूवात झाली. यावेळी 1 इंचाने पातळी कमी झाली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत आणखी 4 इंचानी पातळी घटली. तर दुपारी 2 वाजता पंचगंगा पाणी पातळी आणखी 1 इंच कमी झाली. मध्यरात्री 12 वाजता पंचगंगेच्या राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 47 फूट 9 इंचावर आली असून अजूनही एकूण 85 बंधारे पाण्याखाली आहेत. तर 65 हजार 747 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगेच्या पाणापातळीत वाढ झाल्याने पूराचे पाणी शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर आले होते. यामध्ये शहरातील मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या दसरा चौक - व्हिनस कॉर्नर मार्ग शनिवारी (दि.27) वाहतूकीसाठी बंद होता. मात्र, रविवारी (दि.28) पावसाने संपुर्ण जिल्ह्यामध्ये उघडीप दिल्यामुळे अनेक मार्गांवरील पाणी ओसरले आहे. त्यामुळे अनेक मार्ग वाहतूकीसाठी खुले झाले आहेत. रविवारी पाचनंतर दसरा चौक - व्हिनस कॉर्नर मार्ग वाहतूकीसाठी सुरु करण्यात आलेला आहे.