ओरोस; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा लोकसंख्या वाढीमध्ये नियंत्रित आहे. राज्याच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर 2.30 टक्के कमी आहे. मात्र, अर्भक मृत्यूचे प्रमाण 14.08 टक्के असून ते राज्याच्या तुलनेत जास्त आहे. लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा कुटुंब कल्याण नियोजनात चांगले काम करत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी लोकसंख्या दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सहायक जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदेश कांबळे उपस्थित होते. जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा आणि तळकट या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत जून महिन्यामध्ये 92 डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. या भागात औषधोपचार आणि फवारणी हाती घेण्यात आले असून ही साथ नियंत्रणात असल्याचे डॉ. महेश खलीपे म्हणाले. या भागात दहा आरोग्यसेवक तातडीने नियुक्त करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व वैद्यकीय पथकाने भेटी देऊन पाहणी केली आहे.
सिंधुदुर्गात सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्हा असून लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह असलेला जिल्हा आहे. या जिह्यात जन्मः प्रमाणही कमी असून हजारी लोकसंख्येमागे निव्वळ जन्मप्रमाण 7.04 एवढे आहे तर निव्वळ मृत्यू प्रमाण 16.69 एवढे आहे. हे मृत्यू प्रमाणही जास्त असून जिल्ह्यांतील तरुण वयोगट हा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात व राज्यात स्थलांतरित आहे. जिल्ह्यात जास्त वयोगटाचे वास्तव्य वाढल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कुटुंब नियोजनात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर असून आरोग्य विभागाने विविध उपक्रमात चांगले काम केले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले.