रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जे दूर गेले त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे सांगत मतदार संघातील आपल्या सर्व पदाधिकार्यांशी संवाद साधणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाले आहेत. ना. सामंत सुरतमार्गे चार्टर्ड प्लेनने गुवाहाटीला रवाना झाले व सायंकाळी ते गुवाहाटीत पोहचले. तेथे रेडीसन ब्ल्यू हॉटेलवर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. या घटनेमुळे रत्नागिरीत शिवसैनिकांमध्ये भयान शांतता असून त्यांच्या मनात चलबिचल होताना दिसत आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेले चार-पाच दिवस ना. उदय सामंत हे मुंबईतील वर्षा बंगला व मातोश्रीवर विविध चर्चांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आ. योगेश कदम यांच्या व्यतिरिक्त अन्य आमदार न गेल्याने दक्षिण रत्नागिरीचा शिवसेनेचा गड अभेद्य होता. त्यातच मी अद्यापही शिवसेनेतच आहे, असे अखेरपर्यंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. सामंत सांगत होते. मुंबईतील बैठकांमध्ये सहभागी असल्याने रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील शिवसैनिकही उत्साहात होते.
शुक्रवारी रत्नागिरीतील पाली येथील निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी कोणत्याच विकास कामांबाबत बैठका लावल्या नव्हत्या. शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकारी व राष्ट्रवादीतून त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकार्यांशी त्यांनी संपर्क साधत चर्चा केली. त्यामुळे विधानसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पाली येथील शांतीसदन या बंगल्यात चर्चेसाठी उपस्थित होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या बैठका सुरु होत्या. मतदारसंघातील अनेक मान्यवरांशीही त्यांनी चर्चा केली.
शनिवारी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले ना. उदय सामंत त्यानंतर सुरतला गेले. त्या ठिकाणाहून चार्टर्ड विमानाने ते गुवाहाटीला रवाना झाले. रविवारी सकाळपासून त्यांचे फोन कव्हरेज क्षेत्राबाहेर दाखवत होते. त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडूनही काही माहिती हाती लागत नव्हती. अनेक कार्यकर्ते व तालुक्यातील पदाधिकारी त्यांच्या संपर्कात होते. दुपारनंतर वृत्तवाहिन्यांवर ना. सामंत गुवाहाटीला गेल्याचे दाखवण्यात आल्यानंतर मतदार संघात एकच शांतता पसरली होती. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ना. उदय सामंत हे गुवाहाटीत दाखल झाले व त्यानंतर ते विमानतळावरुन थेट रेडीसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दाखल झाले.
शुक्रवारी रत्नागिरीत आलेल्या ना. उदय सामंत यांनी शनिवारी रात्री सुरतच्या दिशेने कूच केली. रत्नागिरी पोलिसांचा ताफा आंबा घाटाच्या टोकापर्यंत त्यांच्यासोबत होता. त्या ठिकाणाहून रत्नागिरी पोलिसांना माघारी पाठवण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे पथक त्यांच्या सोबत होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील एकही आमदार बंडाच्या पहिल्या दिवशी ना.शिंदे यांच्यासोबत गेलेले नसल्याने येथील आमदार शिवसेनेची एकनिष्ठ असल्याचे बोलले जात होते.मात्र शिंदे गटात आमदारांची संख्या वाढत गेल्यानंतर शिवसेनेचे खेडचे आमदार योगेश कदम, त्यानंतर आ.दिपक केसरकर हे शिंदे गटात सामिल झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरीत तीन आमदार शिवसेनेसोबत राहतील अशी खात्री शिवसेना नेतृत्वाला होती. आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, मंत्री तथा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे आम्ही शिवसेनेसोबतच आहोत असे सांगत होते. मात्र, शनिवारी रात्रीपासून ना.सामंत त्यांच्या पाली निवासस्थानातून गुवाहाटीला रवाना झाल्याने पुन्हा एका शिवसेनेला रत्नागिरीत धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीला धक्का देत सन 2014मध्ये ना.उदय सामंत हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर ते शिवसेनेतून दुसर्यांदा विधानसभेवर गेले होते. राज्यातील राजकिय घडामोडींमध्ये मातोश्री, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत असलेले ना.सामंत गुवाहाटीला गेल्याने येथील शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, रत्नागिरीतील अनेक कार्यकर्त्यांनी आपला सपोर्ट ना. उदय सामंत यांना दर्शवण्यास सुरुवात केली आहे.