कोकण

रत्नागिरी : सेंट्रलाईज किचनची रोजीरोटी हिरावण्याचा प्रयत्न

मोहन कारंडे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये यावर्षीपासून पुन्हा एकदा शालेय पोषण आहार सुरू करण्यात आला. शहरी भागात महिला बचत गटांमार्फत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असून अनेक वर्षे मुलांना दर्जेदार आहार मिळण्याबरोबरच गरीब कुटुंबांतील महिलांना रोजीरोटी मिळत होती. परंतु, सरकारच्या नव्या धोरणामुळे महिला बचत गटाची रोजीरोटी हिरावली जात असून या महिलांवर उपासमारीची वेळ येणार आहे. रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची जबाबदारी आता 'सेंट्रलाईज किचन'च्या नावाखाली परजिल्ह्यातील तीन संस्थांना देण्याचा घाट घातला जात आहे.

राज्यात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर तत्कालीन सरकारने महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते. त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात आली. घरातील अन्न शिजवणार्‍या महिला चिमुकल्यांनाही घराप्रमाणे दर्जेदार जेवण देत होत्या. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शाळा बंद असल्याने त्यामध्ये खंड पडला होता. मात्र आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर गेले दोन वर्षे बंद असलेली रोजीरोटी पुन्हा मिळेल अशा आशेवर असलेल्या रत्नागिरी शहरातील महिला बचत गटांच्या महिलांची रोजीरोटी शासनाच्या नव्या आदेशाने हिरावून घेतली आहे.

शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी आता बचत गट ऐवजी खासगी संस्थाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी शहरातील शाळांसाठी निविदा काढण्यात आली आहे. एक स्थानिक निविदा वगळता परराज्यातील धनदांडग्यांच्या संस्थांनी आहार पुरवण्याचा ठेका मिळण्यासाठी निविदा भरल्या आहे. ठाणे, सांगली, इंचलकरंजी येथील संस्था रत्नागिरी शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरवठा करणार आहेत. रत्नागिरी शहरात 7 हजार 500 विद्यार्थी असून, त्यात न.प. शाळांसह शहरातील अनुदानीत खासगी शाळांचाही समावेश आहे. चारपैकी 3 संस्थांची निवड करण्यात येणार आहे. त्या तीन संस्थांना प्रत्येकी 2 हजार 500 विद्यार्थ्यांना आहार पुरवण्याचा ठेका देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक किचनची पहाणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली असल्याने आता बचत गटाच्या महिलांची रोजी रोटी हिरावली जाणार आहे हे निश्चित झाले आहे.

पोषण आहार पुरविण्याचा ठेका मिळण्यासाठी ठेवण्यात आलेले निकष अतिषय जाचक आहे. त्यातील एकूण क्षेत्रफळ, किचनचे क्षेत्रफळ, कर्मचारी संख्या आदी अटी घालण्यात आल्याने सर्वसामान्य बचत गटातील महिलांना ते निकष पूर्ण करणे शक्य नसल्याने त्यांना निविदा भरणे शक्य झाले नाही. त्याचा फायदा या कंपन्यांनी उठवला आहे. आतापर्यंत मुलांची आवड निवड लक्षात घेऊन बचत गटातील महिला शालेय पोषण आहार प्रशासनाने ठरल्याप्रमाणे करून देत होत्या. परंतु सेंट्रललाईज किचनच्या माध्यमातून सर्व मुलांना एकसारखे जेवण देण्यादृष्टीनेही विचार होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT