रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक असो वा कार्यक्रम, शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांना 'बॅग' द्याव्या लागतात, असा गंभीर आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्यानंतर भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे आक्रमक झाले असून विनायक राऊत यांनी कोकणाचे नाव खराब केले आहे, असा घणाघात करत त्या बॅग नेमक्या कोणासाठी होत्या हे सांगा, असे ट्विट त्यांनी केले आहे.
कोल्हापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. त्याचे पडसाद कोल्हापूर येथे उमटले असतानाच राजेश क्षीरसागर यांनीही जोरदार पलटवार करताना विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कार्यक्रम असो आगार कोणताही कार्यक्रम, त्यांची 'बॅग' तयार ठेवावी लागते अशी थेट शरसंधान केले आहे. या वरून भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले असून ट्विटद्वारे त्यांनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले, विनायक राऊत निवडणूक असो व कार्यक्रम 'बॅगा' द्याव्या लागतात, असे त्यांनी आरोप करताना म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणाचे नाव राऊत यांनी खराब केले, त्या बॅग स्वतःसाठी होत्या की 'मातोश्री'साठी हे विनायक राऊत यांनी स्पष्ट करावे, असे नीलेश राणेंनी ट्विट केले आहे.