अजय गडेकर
वेंगुर्ले ः आगामी नगरपरिषद निवडणुकीत कोण वर्चस्व राखणार, याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजप वर्चस्व राखणार की महायुती वा महाविकास आघाडी टक्कर देणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेवर मागील टर्म मध्ये भाजपचा थेट नगराध्यक्ष निवडून येत भाजपची सत्ता आली होती. त्यावेळी थेट नगराध्यक्ष भाजपचा, तर साडेचार वर्षे उपनगराध्यक्ष शिवसेनेचा तर पुढे राज्यातील राजकीय समिकरणे बदलल्यानंतर उर्वरीत सहा महिने भाजपचा उपनगराध्यक्ष होता. आता बदललेल्या राजकीय समीकरणानंतर वेंगुर्ले नगरपरिषदेवर सत्ता कोणाची येणार व कोण नगराध्यक्ष होणार याची गणिते सर्व पक्षीय मांडू लागले आहेत. वेंगुर्ले शहरात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी दिलीप गिरप, सचिन वालावलकर, सुहास गवंडळकर, विधाता सावंत, संदेश निकम, तुषार सापळे आदी प्रमूख चेहरे आहेत. मात्र नगराध्यक्ष आरक्षणनंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दिलीप गिरप यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात विविध विकासकामे राबवून नगरपरिषदेला देशपातळीवर नावालौकिक प्राप्त करून दिला आहे. तर भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनायक उर्फ सुहास गवंडळकर यांनी भाजपा तालुकाध्यक्ष, नगरसेवक म्हणून काम करताना शहरासह तालुक्यात भाजपा संघटना मजबूत करण्याकडे मोठा वाटा उचलला आहे. याना भाजप नगराध्यक्षपदासाठी पसंत देणार काय? याचर उत्सुकता आहे. दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावालकर यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करीत शहराच्या विकासासाठी आ. केसरकर यांच्या माध्यमातून निधी आणला आहे. तसेच पूर्वी एकसंध शिवसेनेत असतानाही त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. आ. दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक असलेले वालावलकर हे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडणूक आखाड्यात उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही निवडणूक महायुती म्हणून लढवली गेल्यास आ. दीपक केसरकर सचिन वालावलकर यांच्यासाठी आपली ताकद लावू शकतात.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक विधाता सावंत, माजी नगरसेवक तुषार सापळे हे सुधा थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. माजी नगराध्यक्ष संदेश निकम हेही नगराध्यक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्यास तुल्यबळ लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. शहरात भाजप पाठोपाठ महाविकास आघाडीचीही तेवढीच ताकद असल्याने यावेळी महाविकास आघाडी काय रणनीती आखणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.