दोडामार्ग / वैभववाडी पुढारी वृत्तसेवा
दोडामार्ग तालुक्यात गुरुवारी दुपारनंतर निसर्गाने अचानक आपला रंग बदलत जोरदार अवकाळी वादळी पावसाची हजेरी लावली. दिवसभर अंगावर येणाऱ्या उकाड्याने त्रस्त झालेल्या तालुकावासीयांना या अवकाळी सरींनी मात्र सुखद दिलासा दिला. सकाळपासूनच तापमानात वाढ जाणवत होती. उष्णतेमुळे तालुकावासिय हैराण झाले होते.
हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असला तरी, दुपारपर्यंत आकाश स्वच्छ असल्याने अनेकांनी तो अंदाज फारसा गांभीयनि घेतला नव्हता. मात्र दुपारी सुमारे ३ वा. च्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. सायंकाळी साधारण ४:४० वा. अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली.
ढगांचा कडकडाट, विजांचा लखलखाट आणि वेगाने वाहणारा वारा यामुळे काही काळ भीतीदायक वातावरण निर्माण झाले. जवळपास पाऊण तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. विशेषतः दुचाकीस्वारांनी पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा दुकानांच्या आडोशाला आसरा घेतला.
काही ठिकाणी झाडांच्या फांद्या हलताना दिसत होत्या. या वादळी पावसाचा परिणाम वीजपुरवठ्यावरही झाला. तालुक्यातील अनेक भागांत वीज खंडित झाली. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या तालुकावासियांना या अवकाळी पावसामुळे क्षणभर आनंदाची झुळूक दिली.
मालवणात सकाळीच अवकाळी सरी !
मालवणः गेले काही दिवस उष्मा वाढल्याने नागरिक त्रस्त बनले असतानाच गुरुवारी सकाळी मालवण शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. मालवण शहर आणि परिसरात काही काळ सकाळीच पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक व्यापारी आणि व्यवसायिकांची मोठी तारांबळ उडाली.
या पावसामुळे आंबा आणि काजू बागांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी ७ वा.च्या सुमारास अचानक पावसाच्या धारा कोसळून लागल्या. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिक चिंताग्रस्त बनले. मात्र काही वेळातच हा पाऊस बंद झाला. या पावसामुळे काही काळ हवेत गारवा निर्मण झाल्यानंतर पुन्हा उष्मा वाढला. या पावसामुळे आंबा व काजू बागायतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.