कुडाळ :उबाठा गटाकडे आज सक्षम नेतृत्वही नाही आणि तळागाळात काम करणारे उमेदवारही नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी जबरदस्तीने उमेदवारी लादण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याच कारणामुळे आता त्यांच्याच गटातील उमेदवार व कार्यकर्ते अर्ज मागे घेत असून, ही स्थिती उबाठा गटाच्या अपयशाची कबुलीच आहे,अशी तीव्र प्रतिक्रिया आ.नीलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
महायुतीच्या वाढत्या ताकदीकडे लक्ष वेधताना आ. राणे म्हणाले, म्हणाले, महायुती ही केवळ निवडणुकीपुरती युती नसून, ती विकासाची आणि विश्वासाची युती आहे. मागील काही वर्षांत महायुती सरकारने राबवलेल्या विकासकामांमुळे सामान्य जनतेचा विश्वास आमच्यावर अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे विरोधकांचे अनेक कार्यकर्ते आणि उमेदवार स्वेच्छेने महायुतीकडे येत आहेत. ही बाब कुणावरही जबरदस्ती नसून, विकासाच्या कामांवर टाकलेला जनतेचा शिक्काच आहे.
कोकणातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना आ. राणे म्हणाले, कोकणात आज महायुतीच्या बाजूने प्रचंड सकारात्मक वातावरण आहे. काही जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे, हे विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाचे लक्षण आहे. जनतेला विकास हवा आहे, राजकीय गोंधळ नाही.सिंधुदुर्ग जि. प. च्या कामगिरीचा उल्लेख करत ते म्हणाले, मागील 27 वर्षांपासून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जि. प.चा कारभार पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त राहिला आहे.
महायुतीमध्ये कोणतीही कुरबूर नाही !
महायुतीतील एकजुटीबाबत ते म्हणाले, महायुतीमध्ये कोणतीही कुरबूर नाही. सर्व नेते आणि कार्यकर्ते एका कुटुंबाप्रमाणे एकत्र काम करत आहेत. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करण्यात आला असून, हा संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास आ. राणे यांनी व्यक्त केला.