ओरोस : अधिकाऱ्यांनी कामकाजामध्ये शिस्त पाळली पाहिजे, त्याशिवाय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडून काम करून घेतले पाहिजे, त्यांना नियम आणि योजनांची माहिती दिली पाहिजे, असे मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद सदस्य आणि ठेवण्यात पदाधिकाऱ्यांसमोर आल्याची माहिती माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकाऱ्यांची त्यांनी जि.प. अध्यक्षांच्या दालनात बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, सभापती प्रीतेश राऊळ, संतोष साटविलकर, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आपण स्वतःहून या सर्व सदस्यांना भेटण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहोत, असे सांगून खा. राणे म्हणाले, जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल तर कृषी उत्पन्न वाढले पाहिजे.
कृषिपूरक उद्योग निर्माण व्हायला हवेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती मिळावी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक सूचना केल्या. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढायचे असेल तर इथल्या शेती मालाची निर्यात वाढायला हवी, व्यापार वाढायला हवा असे सांगतानाच खा. राणे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्या आता कधीही होतात, तीन महिन्यांसाठी एखादा अधिकारी येतो हे अयोग्य आहे. जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण विभागातील रिक्त पदे, डॉक्टरांची कमतरता व निधीच्या अडचणीबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जोरदार स्वागत, ... गर्दी आणि उत्साह
प्रस्ताव कसे तयार करावेत, निधी कसा मागावा याचे मार्गदर्शन खा. राणे यांनी या बैठकीत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना केले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे जि.प. सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक तासापेक्षा अधिक काळ ही बैठक झाली. दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा कारभार कसा करावा याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
गेल्या चार वर्षात प्रशासकीय कारभारानंतर पुन्हा एकदा खा. राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली आहे. खा. राणे यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद भवनामध्ये रांगोळी काढण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गर्दी होती. तसेच उत्साहाचे वातावरणही होते.