वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी मान्सूनचे दमदार आगमन झाले असून सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शनिवारीही तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. मात्र रविवारी झालेल्या जोरदार पावसाने मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले आहे.
तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा विशेष जोर पाहायला मिळाला. गतवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीटंचाईचे संकट लवकर दूर झाले होते. मात्र यंदा जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यातच हवामान खात्याने यावर्षी सरासरी कमी पाऊस होणार असे सांगितलेमुळे शेतकरी चिंतेत होते. खरीप हंगामासाठी शेतीची सर्व तयारी पूर्ण करून शेतकरी आकाशाकडे आशेने नजर लावून बसले होते.
रविवारी सकाळपासूनच आकाश काळ्या ढगांनी व्यापले होते. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामांना गती मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत सुरू केली असून आगामी चार दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास भात पेरणीसह इतर शेतीकामांना वेग येणार असल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या या दमदार सुरुवातीमुळे तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून पावसाळी हंगामाची आशादायी सुरुवात झाली आहे.