कुडाळ : एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत पुकारण्यात आलेले उपोषण सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. विभाग नियंत्रक यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत येत्या आठ दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गुरुवार पासून होणारे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सर्व प्रश्नांची सोडवणूक येत्या आठ दिवसात झाली नाही तर नवव्या दिवसापासून उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनूप नाईक यांनी दिला आहे.
श्री.नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे बदलीच्या प्रतिक्षेत असणार्या महामंडळ कर्मचार्यांच्या बदल्याचे आदेश प्रशासनामार्फत प्राप्त असूनही इतर विभागात संबंधित कर्मचार्यांना बदली ठिकाणी जाण्यासाठी कार्यामुक्त करूनही सिंधुदुर्ग विभागातील अधिक-यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची बदली होऊनही सोडण्यात आले नव्हते. त्यानंतर 4 डिसेंबर 2024 रोजी मुंबई कार्यालयाने सिंधुदुर्ग विभागाला संबंधित कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत त्यांना सोडण्यात आलेले नाही.
त्या अनुषंगाने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी. कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष अनुप नाईक यांनी उपोषणाची नोटीस दिल्यानंतर बुधवारी विभाग नियंत्रक यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी महामंडळातील अधिकार्यांनी लेखी आदेश असतानाही वरिष्ठांनी तोंडी आदेश दिले असल्याने आजपर्यत सोडले नाहीत असे लेखी उत्तर दिले. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत आपले उपोषण स्थगित करून वरील प्रश्न सोडवण्यासाठी 8 दिवसाची मुदत प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. 8 दिवसांत जर मागण्या मान्य न झाल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा नाईक यांनी दिला आहे.