सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणात पुन्हा एकदा ‘रिव्हर्स मायग्रेशन’ ही मोहीम हाती घेतली आहे. येणाऱ्या सहा महिन्यांत कोकणातील सुपुत्र जे मुंबई आणि पुणे येथे नोकरीसाठी गेले आहेत ते माघारी फिरण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा त्यांनी सोमवारी कणकवलीतील पत्रकार परिषदेत केली.
देशाचे वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि येणाऱ्या गणेशोत्सवासाठी केवळ पाच तासांत मुंबईकर चाकरमानी आपल्या गावी पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कणकवली येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मुंबई-गोवा महामार्ग ३१ मेपर्यंत पूर्ण होईल, असे वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. आता ही डेडलाईन २० जून असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, इंदापूरचा उड्डाणपूल आणि एक-दोन पॅच राहिले आहेत, बाकी सर्व काम पूर्ण झाले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल आणि येत्या गणपतीला कमीत कमी वेळात चाकरमानी गावी पोहोचतील. त्यासाठी त्यांचा प्रवास पाच तासांत होईल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
पर्यावरणाला नजरेसमोर ठेवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून अनेक प्रकल्प कोकणात आणण्याबाबत सकारात्मक आहे. आमच्याकडे केवळ बोटी येणार नाहीत तर काही बोट बनविण्याचे कारखाने देखील सिंधुदुर्गात येऊ घातले आहेत. त्यातून रोजगार निर्मिती होईल.