मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागातआर्थिक काटकसरीचे वारे वाहू लागले आहेत. विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतानाच मंत्री नितेश राणे यांनी सर्व अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आर्थिक व्यवहारांमध्ये काटेकोर शिस्त पाळून विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
राणे यांनी बुधवारी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत विविध मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्याबाबत शासन स्तरावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. सध्या दरवर्षी 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी बंदी लागू असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील वादळी वातावरण, चक्रीवादळे व प्रतिकूल हवामानामुळे 1 ऑगस्टनंतरही मासेमारीसाठी समुद्रात जाणे शक्य होत नाही. शिवाय, या कालावधीत मत्स्य प्रजननास वाव असल्याने बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी मच्छीमार संघटनांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तर, मासेमारी बंदीच्या काळात मच्छिमारांना थेट दिलासा देण्यात येणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
मच्छीमार महिलांसाठी हॅण्डग्लोज व गम बूट योजना
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मच्छीमार महिलांना हॅण्डग्लोज, गमबूट आणि संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील मासळी बाजारांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रक्रिया कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 500 महिला कामगारांना संरक्षण साहित्य वितरित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 30.69 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.