आंब्रड ः राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण कार्यक्रम उपक्रमांतर्गत महाविद्यालयात कुक्कुटपालनाचे शिक्षण घेत आहेत. कृषी पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शासकीय तसेच खासगी नोकरीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू करून स्वतःसाठी तसेच इतरांनाही रोजगाराचा पर्याय उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमात विद्यार्थी कुक्कुटपालन या व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यासणार आहेत. विद्यार्थ्यांना पक्ष्यांच्या निवाऱ्याचे व्यवस्थापन, शेडचे निर्जंतुकीकरण, पक्ष्यांचे विविध आजार आणि प्रतिबंधात्मक लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना, पक्ष्यांची विक्री व विपणन, खासगी कंपन्यांबरोबर करार पद्धतीने कुक्कुटपालन इत्यादी घटक अभ्यासता येणार आहेत.
या उपक्रमामध्ये चतुर्थ वर्षातील विद्यार्थी प्रगती जाधव, प्रमोद जाधव, प्रसाद काकडे, गणेश काळे, निकिता कावणेकर, रोहित कुलकर्णी, शुभम कुंभार, समृद्धी कुराडे, नम्रता महामुनी, एमडी मौलाना, हर्षद मिटके, प्रिया नागरगोजे, विजय नाईक, प्रतीक नलवडे, निर्मला परब, अविष्कार पाटील, साईश्वरी निकम, वैष्णवी भोसले, सिद्धेश पाताडे, आदित्य कोळेकर, गिरीश नाईक, अभिजीत पाटील, नंदणा, ज्योतिका कांदळे सहभागी झाले आहेत.