देवगड : सागराला नारळ अर्पण करून जिल्ह्यात नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानंतर गुरुवारपासून खोल समुद्रातील मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. देवगड तालुक्यात तारामुंबरी, मळई, देवगड समुद्रकिनारी भागात तसेच मालवण व वेंगुर्ले तालुक्यांतील मच्छीमार बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करत उत्सव साजरा केला. ‘बा दर्याराजा, यावर्षी मच्छीमारी हंगामात बरकत दे’, असे साकडे मच्छीमारांनी सागराला घातले.
देवगड बंदरावर तहसीलदार शीतल जाधव, उद्योगपती नंदकुमार घाटे, पोलिस निरीक्षक शाम बुवा, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे, कस्टम निरीक्षक एस. व्ही. पेडणेकर, प्रवीण सावंत, पतन विभागाचे सुमित रोकडे, बंदर विभागाचे मुकुंद खुडे, शिवराम निकम, सतीश खानविलकर तसेच शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक व मच्छीमार आदी उपस्थित होते.
तहसीलदार शीतल जाधव यांच्या हस्ते समुद्राची व मच्छीमारी नौकेची पूजा करण्यात आली. त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. जामसंडे, मळई खाडीकिनारीही बाल मंडळ संगीत मेळा मळईतर्फे सागराला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली.
मळई ग्रामस्थ मुरारी भाबल यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती, गाऱ्हाणे करून नौकांमधून मळई ग्रामस्थ व मच्छीमारांनी सागराला नारळ अर्पण केला. मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, प्रदोष कोयंडे, जयप्रकाश कोयंडे, रूपेश मणचेकर, सचिन मुणगेकर, अजित कोयंडेे, सुरेश मणचेकर, अनिकेत कोयंडे, नासीर खान आदींसह मळई ग्रामस्थ मच्छीमार व महिला उपस्थित होत्या. तारामुंबरी येथे सागराला सुवर्णश्रीफळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. सायंकाळी ५ वा. तारामुंबरी विठ्ठल मंदिराकडून सुवर्णश्रीफळ व कलशासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.