कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खराब हवामान, अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे NDRF/SDRF च्या निकषानुसार पंचनामे करून शासनाला मदतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व आंबा व काजू बागायतदार शेतकरी यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे व प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आंबा व काजू पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आणि मदतीचा लाभ मिळवण्यासाठी सर्व आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रे तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावयाची आहेत.
त्यामध्ये सर्वसाधारण पंचनामा फॉर्म, आंबा पिकासाठी NDRF/SDRF पंचनामा फॉर्म, काजू पिकासाठी NDRF/SDRF पंचनामा फॉर्म, नवीन 7/12 उतारा (ओरिजनल), स्पष्ट दिसणारे बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स यांचा खाडाखोड न करता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावयाची आहेत. जेणेकरून मदतीच अहवाल शासनास वेळेत सादर करता येईल. हैं कागदपत्र जमा करण्यासाठी अंतिम मुदत २४ एप्रिल् ठेवण्यात आली आहे.
ई-पीक नोंदणीचा अडसर
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर चालू म्हणले २०२५-२६ वर्षाची ई-पीक पाहणी नोंद केलेली नाही. सातबारावर चालू वर्षांच्या ई-पीक पाहणीमध्ये आंबा, काजू पिकाची नोंद नसल्यास त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळणे कठीण होणार आहे. अनेक भागात अद्यापही ई-पीक पाहणी झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे पंचनामे व मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करू शकणार नसल्याने ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.