कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे बारमाही नदीवर जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याबाबत माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ना.नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नुकतीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खारेपाटण परिसराची स्थळ पाहणी केली.
स्थळ पाहणी दरम्यान बारमाही नदी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनासाठी असलेली क्षमता, तसेच बोटिंग, शिकारा राईड, कयाकिंग, नदी सफारी यांसारखे उपक्रम राबविण्याच्या शक्यता यांचा प्राथमिक आढावा घेण्यात आला. याशिवाय नदीकाठ सुशोभिकरण, वॉकवे, लाइटिंग, पर्यटकांसाठी सुविधा केंद्र, तसेच रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचाही विचार करण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्यात येणार असून, या प्रकल्पास गती देण्यासाठी आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे खारेपाटण परिसराच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी भावना रमाकांत राऊत व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.