सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावातील चर्मकार वस्तीवर जाणाऱ्या पारंपरिक पायवाट खुली करून द्यावी, या मागणीसाठी कारिवडे ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या निवेदनानुसार शांताराम कारिवडेकर यांच्या जुन्या घराच्या अंगणातून विहिरीकडे जाण्यासाठी वडिलोपार्जित पायवाट अस्तित्वात होती. सुमारे 10 वर्षांपासून संबंधित व्यक्तींने या वाटेने ये-जा करण्यास मनाई केली आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कारिवडे, तंटामुक्ती समिती, तहसीलदार, सावंतवाडी तसेच पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रश्न दुर्लक्षित आहे.
मंडळ अधिकारी, माडखोल यांनी केलेला पाहणी अहवाल पंचंयादी न घालता केलेला असून वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाहणी वेळी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील तसेच ज्येष्ठ नागरिकांना न बोलावता अहवाल तयार करण्यात आल्याने तो अमान्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून नव्याने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पायवाट बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणे, तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी ने-आण करणेही कठीण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पारंपरिक पायवाट तत्काळ खुली करून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या उपोषणामध्ये कारिवडे येथील अनंत कारिवडेकर, नारायण कारिवडेकर, उत्तम कारिवडेकर, अनिल कारिवडेकर, स्नेहा कारिवडेकर, अनिता कारिवडेकर, शारदा कारिवडेकर, भारती कारीवडेकर, उज्ज्वला कारिवडेकर, नीलेश कारिवडेकर, गोपिका कारिवडेकर यांचा सहभाग होता.